Tuesday, August 28, 2007

जाळं

मी त्या घरातलाच एक सदस्य होतो.काही दिवसांपुरवीच रहायला आलो होतो.काही दिवसातच मी त्या घराला अगदी आपलसं केलं होतं. मस्त होतं ते नविन घर! फक्त त्या घरातले बाकीचे होते ना, त्यांना मी फारसा पसंत नाहीसं वाटलं! पण ते काय, नाखुषीचा सूर लावणारच की! कारण आता त्यांच्या हालचालींवर मर्यादा येत होत्या ना! पण एकूणात मी खाऊन पिऊन सुखी होतो. पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे मला अधिक अधिक संघर्ष करावा लागत होता. बाकीच्यांनी मिळून जणु काही डाव टाकला होता माझ्यावर. सतत दुर्लक्ष,सतत उपेक्षा!काही दिवसांनी तर मला शंका यायला लागली की हे माझी कटकट घालवायला मला दगाफटका तर करणार नाहित ना! पण माझ्या सुदैवाने, मी शारिरिक बळात त्यांच्यापेक्षा कितीतरी वरचढ असल्याने ते उघडउघड काही करू शकत नव्हते.

पण आता मला त्यांच्याविरूद्ध काहीतरी उपाय योजावाच लागणार होता. असं किती दिवस चालणार! कधी न कधी डाव साधतील ते! काहीतरी करून सर्वांना सापळ्यात पकडून त्यांचा काटा काढायला हवा. आणि लवकरच तशी संधी चालून आली. त्या घराचे मालक,त्यांच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी बाहेरगावी जाणार होते. सामानाकडे बघून, निदान १-२ दिवस तरी येणार नाहित असं वाटलं. हीच संधी होती. ह्या दिवसात त्यांना सापळ्यात अडकवून खलास करायला हवं. नंतर पुन्हा संधी मिळणार नाही.

मी लगेच कामाला सुरवात केली. रोज रात्री ते सर्वजण बाहेर पडत. ह्याच वेळी मी त्यांच्या भोवती माझं जाळं विणायला सुरवात केली. त्यांना कळणारही नाही असं.मला त्यांना बेसावध पकडून त्यांना ठार करायचं होतं. म्हणजे मग ह्या घरात मला विरोध करणारा कोणी उरणार नाही.आधी मी त्यांच्या बाहेर पडायच्या मार्गांवर नजर ठेवू लागलो. ते मार्ग सर्वात शेवटी बंद करायचे. म्हणजे ज्या दिवशी माझा हल्ला सुरू होईल त्या दिवशी. म्हणजे मी झडप घातल्यावर त्यांना पळायला ही जागा उरता कामा नये.माझी तयारी पुर्ण होत आली. तारीख निश्चित केली.

आणि ती रात्र आली. मी दबा धरून बसलोच होतो. मला एकाची चाहूल लागली. माझा सापळा तयारच होता. त्याने त्यात फक्त पाय टाकयचा अवकाश! आणि अपेक्षेप्रमाणे मी टाकलेल्या जाळ्यात अलगद फसला. काही कळायच्या आत त्याचे हात पाय जखडले गेले.मी लगेच त्याच्याजवळ गेलो आणि त्याने काही आवाज करायच्या आतच त्याला ठार केलं. माझं पहिलं सावज! त्याचंच रक्त पिऊन मी माझा पहिला विजय साजरा केला. त्यानंतर त्याच्या देहाची मी विल्हेवाट लावली, आणि सापळा पुन्हा तयार केला. हो! उगाच कोणाला शंका यायला नको! त्यानंतर मग मी मुळीच वेळ दवडला नाही. सरळ हल्ला सुरू केला. फारच सोपं होतं काम! एकेकाला गाठायचं, त्याला ठार केलं की पुढचा! माझ्या ताकदीपुढं कोणाचाही निभाव लागेना. त्यांना पळताही येत नव्हतं. बाहेर जायच्या सर्व खिडक्या, दारं सगळे मी आधीच "सील’ करून टाकले होते. एकाच रात्रीत त्या सर्वांचा निकाल लावला. एक दोघं , जे मला नंतर लपून बसलेले सापडले, त्यांना मी उदारपणे बाहेर सोडून दिलं. हो, तेव्हढंच थोडी दया दाखवल्याचं पुण्य!

तो एक दिवस मी त्या घरात अगदी राजासारखा घालवला.अतिशय ऎषारामात. उद्या ते कुटुंब परत येईल. मग तेव्हा त्यांच्याकडेही बघून घेइन. आता कोण अडवणार मला! स्वत:च्याच धुंदीत होतो.

दुस-या दिवशी ते तिघंही आले परत.दार उघडून ते आत आले. आत आल्यावर त्यांनी घरभर नजर फिरवली. त्या काळरात्रीच्या खुणा अजुन शिल्लक होत्या. त्यांच्याकडे आश्चर्याने बघत, ती बाई म्हटली
," ईईई काय गं बाई! २ दिवसात ही एवढी कोळ्याची जाळी कशी काय झाली? छे बाई. थांबा हं. मी आता साफ करते!! "
असं म्हणत तिने कुंचा उचलला आणि त्याच्या एकेका फटका-यानिशी माझी २ दिवसांची मेहनत ती कच-यात घालायला लगली. मी तरी काय करू शकणार! तेव्हढ्यात मी तिच्या नजरेत आलो, आणि एक फटका-यानिशी मीही खिडकीतून बाहेर फेकला गेलो!छे! आता पुन्हा नविन घर शोधा, पुन्हा नविन दुश्मन, पुन्हा नविन युद्ध! देवा, मला ह्या जन्मात कोळी बनवलंस, पण पुढचा जन्म माणसाचा दे रे बाबा!

Thursday, April 19, 2007

संशय

मुग्धा अतिशय अस्वस्थ मनाने घरातल्या घरात फे-या मारत होती.तिचे गेला आठवडा अतिशय बेचैनीत गेला होता.तिचा नवरा गिरीष, ह्याचे दुस-या कोणा बाईबरोबर संबंध आहेत अशी कुणकुण तिला लागली होती, आणि ह्याची खात्री कशी करून घेता येईल, ह्याचाच विचार ती करत होती.....

मुग्धा आणि गिरीषचा प्रेमविवाह होता.गिरीषच्या दृष्टीने बोलायचं झालं, तर मुग्धासारख्या श्रीमंत मुलीला गटवणे, हे त्याचे आयुष्यातलं एकमेव कर्तृत्व होतं,आणि तो सध्ध्या त्याच्या सास-याच्या कंपनीत, त्याच्याच कृपेने मिळालेल्या एका बड्या पदावर कामाला होता.फुकट मिळालेल्या वस्तूची जशी आपल्याला किंमत नसते, तसंच गिरीषला त्याच्या नव्या पदाच्या जबाबदा-यांशी काहीही देणंघेणं नव्हतं. मनाला मानेल तेव्हा कंपनीत यावं, मनसोक्त गप्पा हाणाव्यात, अगदी किरकोळ काम जमलच तर करावं, आणि संध्याकाळी ५च्या ठोक्याला कंपनीतून बाहेर पडून, नंतर एखाद्या बारमधे बसून नंतर मग आरमात घरी यावं, असा त्याचा रोजचा भरगच्च कार्यक्रम असे. त्याच्या सास-यांनी त्याची अनेकदा कानउघडणी करूनही त्याच्यात काहीही फरक नव्हता.

त्याचं ऑफिसातलं हे वागणं, त्याचा एक प्रतिस्पर्धी रमेशला अजिबात पटायचं नाही. रमेश हा अतिशय मेहनतीने, स्वकर्तृत्वावर त्याच्या पदापर्यंत येऊन पोचला होता. त्याने अनेकदा गिरीषबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली होती, पण मालकाचाच जावई असल्यामुळे तेही काही करायला धजावले नव्हते. हे गिरीषला कळल्यामुळे त्याचा रमेशवर राग होता. तो सतत रमेशला पाण्यात पहायचा.

रमेशनीच मुग्धाला फोन करून गिरीष्च्या प्रकरणाबद्दल माहिती सांगितली होती.त्यानी गिरीषला एका तरूणीबरोबर थेटरात जाताना पाहिले होते, आणि लगेच ही खबर त्याने मुग्धाला सांगितली होती. मुग्धानी त्याच दिवशी गिरीषला त्याच्या ऑफिसातल्या मित्रमैत्रिणींबद्दल जरा खोदून खोदून चौकशी केली होती, पण गिरीषने तिला कशाचाही थांगपत्ता लागू दिला नव्हता.

पण आज तिच्याकडे खात्री करून घ्यायची एक संधी अचानक आली होती.गिरीष एका conference साठी लोणावळ्याला जाणार होता.तिला रमेशनी फोन करून सांगितलं होतं, की गिरीषनी त्या तरूणीला पण तिकडे बोलावून घेतलं आहे, व त्यांचा तिकडे मनसोक्त मजा मारायचा बेत आहे. त्यामुळे त्या दिवशी गिरीषच्या मागोमाग मुग्धाही दुस-या गाडीत बसून त्याचा पाठलाग करू लागली. मधेच अचानक त्याची गाडी कुठे गायब झाली ते मुग्धाला समजलच नाही. पण सुदैवाने तिला conferenceजिथे होणार होती त्या हॉटेलचा पत्ता ठाऊक होता. गिरीषची गाडी सापडेना, तशी मुग्धा सरळ त्या हॉटेलवरच जायला निघाली.

मुग्धाला त्या हॉटेलवर पोचायला जवळ जवळ तीन तास लागले.कारण तिच्या गाडीचे ब्रेक मधेच फेल झाल्यामुळे, तिला तासभर मेकॅनीककडे रखडावं लागलं होतं.हॉटेलवर पोचल्यावर तिने लगेचच गिरीषची गाडी सापडली. ती तडक त्याच्या खोलीकडे निघाली. त्याच्या खोलीचं दार धाडदिशी उघडून ती आत शिरली...

पण आत गिरीष एकटाच होता. तो तिला बघून एकदम आश्चर्यचकित झाला. तिने मग काहीतरी थातूरमातूर कारण सांगून वेळ मारून नेली.मात्र मनातल्या मनात मात्र ती खूप आनंदीत झाली होती. तिच्या मनावरचं एक ओझं उतरलं होतं.

त्यानंतर दुस-या दिवशीच पोलिस त्यांच्या दारावर आले. एका तरूणीचा खून झाला होता, आणि तिच्या घरात गिरीषचा फोटो सापडला होता. हे ऎकून मुग्धा भोवळ येऊन पडायच्या बेतात आली होती.तेवढ्यात पोलिस म्हटले," तुम्ही कोणा रमेशला ओळखता का? त्या तरूणीच्या घरात एक चिट्ठी सापडली आहे. रमेश नावाच्या माणसाने लिहीलेली. त्यात असं म्हटलं आहे की ह्या तरूणीने गिरीषला आपल्या जाळ्यात ओढलं तर तिला हा रमेश दहा हजार रुपये देईल."....

पोलिस निघून गेल्यावर मुग्धा स्फुंदत स्फुंदत गिरीषला म्हणाली," ह्या रमेशनीच मला तुझ्या विरूद्ध, खोट्यानाट्या बातम्या सांगितल्या. माझ्या मनात तुझ्याविषयी संशय निर्माण केला. मे चुकले. पण आता मात्र मे कधीच तुझ्यावर असा संशय घेणार नाही."

गिरीषने प्रेमाने तिल मिठीत घेतलं.मुग्धाच्या गाडीतले ब्रेक्स अगोदरच फेल करून ठेवण्याच्या, तेवढ्या वेळात आपल्या त्या प्रेयसीचा, हाताचे कुठेही ठसे न उमटू देता खून करण्याच्या व नंतर अतिशय वेगाने गाडी चालवून तिच्या आधी लोणावळ्याला पोचण्याच्या, स्वत:च लिहीलेली रमेशच्या हस्ताक्षरातली चिट्ठी व स्वतःचा फोटो तिच्या घरात ठवण्याच्या, ह्या सगळ्या गिरीषने घेतलेल्या श्रमांचे आत्ता सार्थक झालं होतं. रमेश विरुद्ध प्रत्यक्ष पुरावा काही नसल्यामुळे तो कदाचित निर्दोष सुटेलही, पण त्याचे आयुष्य मात्र बरबाद झालं होतं. ह्या विचाराने, तिला मिठीत घेतल्यावर त्याच्या चेह-यावर उमटलेलं क्रूर स्मित तिला दिसणं शक्यच नव्हतं.......




Saturday, March 17, 2007

पुनर्भेट

"A criminal always returns to the scene of crime." ही शेवटची ओळ वाचून मी ते पुस्तक मिटलं. किती मूर्ख कल्पना!! असा कोण गुन्हेगार असेल जो स्वतःहून परत गुन्ह्याच्या जागेला भेट देईल आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल? त्या लेखकाच्या मते गुन्हेगाराला कायम 'आपण काही पुरावा मागे तर सोडल नाही ना?' ह्या भीतीने त्या जागेला भेट देतो, तो पुरावा नष्ट करण्यासाठी. नक्कीच अतिशय मूर्ख गुन्हेगार असला पाहिजे तो! जर नीट प्लॅन करून गुन्हा केला तर पुरावा मागे राहिलच कशाला?आता माझंच उदाहरण घ्या ना!

मी आहे ह्या शहरामधला एक कुप्रसिद्ध contract killer.माझे काम अतिशय झटपट असे, व मी कुठलाही पुरावा मागे सोडत नसे. त्यामुळे माझे "clients" माझ्यावर अतिशय खूष असत.जेव्हा माझ्यासरखे सुशिक्षित बेकार तरूण नाईलाजापोटी हा पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग अनुसरतात, तेव्हा त्या गुन्ह्यामागची भयानकता कैक पटीने वाढते.मी माझ्या सावजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करत असे. अगदी त्याच्या खाण्यपिण्याच्या सवईपासून, ते त्याच्या पगार किती आहे, त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत इत्यादी सर्व माहिती मी जमवत असे.त्यावरून मग मी त्याला संपवण्याची एक योजना बनवत असे. त्या योजनेच्या प्रत्येक पायरीला मी safety valves ठेवीत असे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही काही चूक होती आहे असं वाटलं तर मी तिथून सुरक्षितपणे निसटू शकत असे.माझी योजना केवळ खून करून संपत नसे. त्या खूनाशी संबंधित कुठलाही पुरावा पोलिसांना सापडणार नाही ह्याचा पुरेपूर बंदोबस्त करूनच मी माझे काम संपवत असे. त्यामुळेच माझ्या कित्येक सावजांची प्रेतंही अजुन पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळे मला परत गुन्ह्याच्या जागेला परत भेट द्यायची कधी आवश्यकताच नसायची.....

त्या दिवशी दुपारी मी असाच एक "काम" संपवून एका बंगल्यातनं बाहेर पडलो. मी शक्यतो माझी कामं सकाळच्या वेळीच संपवत असे. कारण माझा अनुभव होता की सकाळच्या वेळी काम संपवून मग गर्दीमधे मिसळून जाणं रात्रीपेक्षा जास्ती सोपं आणि सोयीस्कर असतं. शिवाय माझं सावज एक गृहिणी होती, आणि त्या दुपारीच घरी एकट्या सापडतात.दुस-या दिवशी मी वर्तमानपत्रात त्या खूनाविषयी काही बातमी आली आहे का ते बघत होतो. पहिल्याच पानावर बातमी होती. मी बातमी वाचू लागलो. त्यातला एक परिच्छेद वाचून मात्र मी हादरलो.

"ह्या खूनाचा तपास करणारे अधिकारी ईन्स्पेक्टर प्रताप गोखले ह्यांनी पत्रकारांना सांगितले की ह्या खून पहाणारा एक eyewitness पोलिसांना मिळाला आहे. त्यांचं नाव आहे श्री.आपटे. त्यांचा त्याच रस्त्यावर बंगला आहे.त्या दिवशी दुपारी श्री. आपटे त्यांच्या बंगल्याच्या गॅलरीत बसले असतानाच त्यांना समोरच्या बंगल्याच्या खिडकीतून खून होताना दिसला. त्यांनी खुन्याचं वर्णनही पोलिसांना सांगितलं आहे. त्यावरून खुन्याचे छायाचित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला खात्री आहे की आम्ही त्या खुन्याला लवकरच अटक करू..... इ.इ...."

अरे बाप रे! मी खून करताना खिडकी बंद करायची विसरूनच गेलो होतो!पण तरीही एक गोष्ट माझ्या बाजूची होती. त्या मूर्ख अधिका-याने त्या eyewitness ची माहिती उघडपणे पत्रकारांना सांगून टाकली होती. आता फक्त त्याला शोधून खतम केला की मग मी पुन्हा निर्धास्त होऊ शकत होतो. मी तो खुनाचा प्रसंग आठवू लागलो. विशेषतः त्या खिडकीतून दिसणारा बाहेरचा देखावा.समोर कोणकोणते बंगले होते, व त्यापैकी किती बंगल्यांच्या गॅलरीतून ती खिडकी दिसू शकत होती हे मी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला.माझ्या डोळ्यासमोर दोन-तीन बंगले आले ज्यांच्या बाबतीत हे शक्य होतं. आता फक्त त्याच्यात्ला आपट्यांचा बंगला कोणता हे शोधून त्यांना संपवलं की झालं. हे काम लगेच उरकायला हवं होतं. कारण एकदा का माझं छायाचित्र तयार झालं की माझी कंबक्तीच!



त्याच रात्री मी परत त्या रस्त्यावर गेलो. आपट्यांचा बंगला सापडणं काही फार कठीण गेलं नाही. वरती एकाच खोलीत दिवा जळतना दिसत होता. माझं नशीब जोरावर होतं.आपटे एकटेच घरात होते बहुतेक. मी सवयीनुसार माझ्याकडच्या master key ने दरवाजा उघडला. आत काळोखच होता. दोन तीन पावलं पुढे गेलो असेल नसेल, तोच अचानक दिवे लागले आणि माझ्या पाठीमागुन आवाज आला "हॅण्ड्स अप!" मला सर्व डाव एका क्षणात समजला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता........

आज इथे, जेलमधे बसून मी विचार करत होतो, की मी नक्के का पकडला गेलो? कुठे चूक झाली?आणि एकदम मला उत्तर मिळालं, मी माझ्या मनातल्या मनात का होईना, परत त्या खुनाच्या जागेला भेट दिली होती, आणि तिथेच फसलो!! खरंच , 'A criminal always returns to the scene of crime!!!!"




भविष्य

गिरीश रानडे हा एक सर्वसामान्य उच्चशीक्षित तरूण होता. लग्न,संसार सारं काही सुरळीत सुरू होतं.एकंदरीत सुखवस्तू म्हणतात तसला गृहस्थ. एकच समस्या होती. त्याचा ज्योतीषावर जरा जास्त विश्वास होता. हे त्याच्या बायकोला अजिबात आवडायचं नाही. ती त्याला सारखं म्हणायची, हे तुझं ज्योतीषच एक दिवशी आपला घात करेल.पण तिचं भविष्य एवढ्या भयानक रितीने खरे ठरेल असं त्याल स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं........

त्या दिवशी गिरीष जरा लवकर कामावर निघाला होता.जाताना वाटेत, त्याला त्याच्या गाडीतून, कोप-यावर एक ज्योतिषी बसलेला दिसला.लगेच त्याला वाटलं, चला बघुया तर खरं काय लिहीलंय आपल्या भाग्यात आज! लगेच स्वारीने गाडी तिकडे वळवली.ज्योतिषाने जे भविष्य सांगितलं ते ऎकून मात्र गिरीष हादरला.त्याला क्षणभर काही सुचेनाच. जरा भानावर आल्यावर त्याने विचार केला," जर हे भविष्य मला खोटं ठरवायचं असेल, तर मला आज कोणाशीही भेटून चालणार नाही. आजचा दिवस अगदी एकट्याने घालवायला हवा." त्याने लगेच बायकोला फोन करून सांगितलं," मला आज तातडीचं काम निघालं आहे, त्यासाठी बाहेरगावी जावं लागेल. मी उद्या सकाळी परत येईन." त्याने तडक गाडी मागे वळवली, आणि शहरातलं एका चांगल्याशा हॉटेलात गेला. तिथे एका दिवसापुरती खोली भाड्याने घेतली. उरलेला संपूर्ण दिवस त्याने खोलीवरच काढला. जेवणही तिथेच मागवलं. त्या रात्री,ते भविष्य आपण टाळलं असा विचार करत तो शांतपणे झोपला. पण नियती थोडीच झोपी जाते? तिचे पडद्यामागचे खेळ सुरूच असतात...

दुस-या दिवशी सकाळी गिरीष उठला. प्रातर्विधी उरकून त्याने वेटर्ने सकाळेच बाहेर आणून ठेवलेला पेपर उचलला.पहिल्या पानावरची ती बातमी पाहून तो हादरलाच!

"नामवंत सर्जन डॉ. गिरीष रानडे ह्यांच्या पत्नीचे अपघाती निधन"
काल दुपारी, नामवंत सर्जन डॉ.गिईष रानडे ह्यांच्या पत्नी, सौ.प्रमिला रानडे, बाजारःआत करून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला एका भरदाव ट्रकने धडक मारली.सौ.रानडे जागीच बेशुद्ध झाल्या. जमावाने त्यांना जवळच्याच हॉस्पीटलमधे भरती केलं. योगायोग म्हणजे ते हॉस्पीटल त्यांचे यजमान डॉ.गिरीष रानडे यांचच होतं.पण हॉस्पीटल मधल्या स्टाफने सांगितलं की आज डॉक्टर हॉस्पीटल मधे आलेच नाहीत, व त्यांचाही मोबाईलही बंद होता .सौ. रानडेंचं तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं असल्यामुळे त्यांना नाईलाजाने दुस-या होस्पीटलमधे भरती करण्यास न्यावं लागलं. दुर्दैवाने वाटेत ambulance ट्रॅफिक जॅम मधे अडकल्याने दुस-या हॉस्पीटलला पोचायच्या आतंच त्यांचं निधन झालं. त्यानंतर अजुनही डॉक्टरांशी संपर्क होऊ शकलेला नाही.....
भोवळ येऊन पडण्यापुर्वी गिरीषला ज्योतिषाचं भविष्य आठवत होतं, " आज तुमच्या चुकीमुळे अथवा निष्काळजीपणाने, तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जिवाला धोका पोचू शकेल..............."


सुटका..

६ वर्षांचा गंपू त्यच्या घराच्या एक कोप-यात अवघडून बसला होता. त्याच्या घरात आज बरीच वर्दळ सुरू होती. पोलीसही आले होते."पंचनामा", "विषप्रयोग" असले काही शब्द त्याच्या कानावर पडत होते. पण त्यांचा अर्थ कळण्याएवढा तो अजुन मोठा झाला नव्हता.....


गंपू ४ वर्षांचा असतानच त्याची आई गेली. बाबांनी वर्षभरातच नविन लग्न केलं होतं. गंपूचे बाबा म्हणजे त्या शहरामधली एक बडी असामी होते. श्रीमंत, कर्तबगार, कर्तृत्ववान माणूस.त्याच्या सावत्र आईने त्याच्या बाबांशी लग्न केलं, ते केवळ त्यांच्या पैशांच्या मोहाने, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ होती.त्यांच्या पैशावर मनसोक्त मजा मारणे हेच तिचे काम होतं.त्यामुळे त्यांची बरीच भांडणंही होत.ह्या सर्व त्रासामुळे त्याच्या बाबांना दारूचे व्यसन लागलं होतं. निद्रानाशाचा विकारही जडला होता. रात्रभर दारू पिऊन ते पहाटे कधीतरी झोपी जात.

साहजिकच त्या व्यसनांपायी गंपूचे बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते.ते त्यच्याशी दोन शब्दही धड बोलत नसत.त्याला फ़ारसे मित्रही नव्हते. त्यामुळे शाळेतून घरी आलं की गंपूला घर खायला उठायचं.नाही म्हणायला त्याची मावशी त्याच शहरात रहायची. तिला स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिचा गंपूवर फार जीव होता. तिच्याकडे जायला मात्र त्याला फार आवडायचे. ती त्यच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याचे सगळे लाड पुरवायची. गंपू तिला अनेकदा विचारायचा देखील, "मावशी, मला कायमचं तुझ्याकडे नाही रहाता येणार?"त्यावर ती काय बोलणार? नुसतं हसून ती विषय बदलायची.

त्याच्या बाबांच्या खुनाच्या आरोपावरून त्याच्या सावत्र आईला अटक झाली.काल रात्री ते दोघंही रोजच्याप्रमाणे भरपूर दारू पिऊन झोपून गेले होते. सकाळी बघितलं तेव्हा मात्र त्याचे बाबा जिवंत नव्हते.दारूतनंच विष दिलं असावं असा पोलिसांचा संशय होता.खुनाला सबळ कारणही होतं.त्याच्या बाबांनी उतरवलेल्या विम्याला नुकतंच एक वर्ष पुर्ण झालं होतं. त्यामुळे आता त्यांचा मृत्यू झाला असता, तर कायद्याप्रमाणे, ती सगळी रक्कम त्याच्या आईला मिळणार होती. त्याच्या मावशीनं ह्यापुढे त्याची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं.त्यामुळे मात्र गंपू खूष झाला होता.

त्या रात्री मावशीच्या घरी जेवताना गंपू तिला म्हटला, " मावशी, माझ्या दुस-या आईने बाबांचा मर्डर केला असं पोलिस सांगत होते. मर्डर म्हणजे काय गं? ?"

"तुला नाही कळायचं ते इतक्यात. अजुन लहान आहेस तू."

"आणि मावशी, परवा नाही का मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणत होतीस , की ते सीरियल मधे दाखवतात ते सगळं खोटं असतं म्हणून.."

"हो रे बाळा. चुकलं माझं. तशा हलकट बायका खरोखरंच असतील असं वाटलं नव्हतं मला."

" मग मी , त्या सीरियलमधल्या बाईप्रमाणे, काल बाबांच्या झोपेच्या गोळ्या त्यांच्या दारूत हळूच मिसळल्या, तशा माझ्या दुस-या आईच्या दारूत मिसळल्या, तर तीही देवाघरी जाईल? सांग ना मावशी.. मावशी? तुला काय झालं? तू एवढी घाबरली का आहेस?तुला काय होतंय? मावशी!!! मावशी!!............"